Wednesday 9 November 2022

पापिरस - प्राचीन इजिप्तचा कल्पवृक्ष

 


कागद बनविण्याचा शोध लागे पर्यंत आपले पूर्वज भूर्जपत्र, लाकडाच्या फळ्या, झाडाची सालं, मातीच्या टॅब्लेटस् किंवा चक्क दगड अशी साधने वापरून आपल्या दैनंदिन व्यवहाराच्या नोंदी, महत्वाच्या घडामोडी, धार्मिक उपदेश किंवा राज्यकारभाराच्या बखरी लिहून (किंवा खोदून!) ठेवत असत. 

 मी इजिप्तला जाईपर्यंत, पापिरस म्हणजे सुद्धा प्राचीन ईजिप्शियन समाजात फक्त कागदाला पर्याय म्हणून वापरण्याची वस्तू अशीच माझी समजूत होती. इजिप्तमध्ये फिरताना, लक्झर, कार्नाक किंवा अबू सिम्बेल  सारख्या प्राचीन देवळात किंवा लक्झरमध्ये नाईल नदीच्या पश्चिम किनाऱ्यावरील राजेराण्यांच्या थडग्यातील भित्तिचित्रात, विविध प्रकारे चितारलेल्या पापिरसच्या प्रतिमा आणि त्यांचं एकूणच वास्तुरचनेतील महत्व पाहून, ह्या साध्या गवत किंवा बांबू सारख्या दिसणाऱ्या वनस्पतीला प्राचीन इजिप्तशिअन संस्कृतीमध्ये काहीतरी विशेष महत्व असलं पाहिजे मला वाटू लागलं. उदाहरणार्थ, हा राजा सेटी पहिला ह्याच्या कार्नाक मंदिरातील मंडपाचा पापिरसच्या देठाच्या आकाराचा खांब, किंवा हे अबू सिंबेलच्या देवळातील भित्तीचित्र - देवी हॅथोर गाईच्या रूपात, पापिरसच्या शेतात.



नारळ हा जसा आपल्या कोंकणाचा कल्पवृक्ष आहे तसंच काहीसं स्थान पापिरसला इजिप्त मध्ये होतं. त्याच्या पासून कागदासारखी भूर्जपत्रे बनवून लिहिण्यासाठी तर त्याचा उपयोग केला जात असेच, पण पापिरस विणून बनविलेल्या होड्या/तराफे हे नाईल नदीतून होणाऱ्या दळणवळणाचं महत्वाचं साधन होतं. ह्या नावा/तराफे इतक्या उत्तम दर्जाचे असत की थॉर हेयरदाल हा मानववंशशास्त्रज्ञ अश्याच नावेतून प्रवास करून पूर्ण अटलांटिक महासागर पार करून दक्षिण अमेरिकेपर्यंत गेला. त्याची हकीकत “आम्ही पार्लेकर” मधील माझ्या वर्षभरापूर्वीच्या लेखात वाचलेली कदाचित तुम्हाला आठवत असेल. पण त्याशिवाय पापिरसचा गाभा उकडून खाल्लाही जात असे, उरलेल्या भागाचा गाई-गुरांना चारा  म्हणून किंवा स्वयंपाकासाठी जळण म्हणून वापर होत असे. त्यापासून चटया, टोपल्या बनविल्या जात आणि घरांचं छप्परही बनविता येई. 


पण पापिरसला प्राचीन ईजिप्शियन संस्कृतीत महत्वाचं स्थान असण्याचं कारण निव्वळ त्याची दैनंदिन जीवनातली उपयुक्तता एव्हढंच मात्र नव्हतं. पापिरस हे एक अतिशय महत्वाचं राजकीय आणि धार्मिक प्रतीक होतं.  


राजकीय दृष्ट्या प्राचीन इजिप्तचे दोन मुख्य विभाग होते - नाईल नदीच्या मुखाजवळील म्हणजे साधारणतः  प्राचीन मेम्फिस पासून (आजच्या कैरो शहराच्या जवळ दक्षिणेला) भूमध्य सागरा पर्यंतचा उत्तरेचा प्रदेश (Lower  इजिप्त) अणि तेथून दक्षिणेला नाइल नदीच्या उगमापर्यंतचा प्रदेश (Upper इजिप्त). दोन्ही विभागांमध्ये राजकीय क़ुरबुरी, वेळप्रसंगी हाणामाऱ्याही चालू असत. मग एखादा दुसरा रामसेस किंवा तिसरा अमेनहोतेप सारखा बलिष्ठ राजा गादीवर बसल्यावर दोन्ही बाजूंना वठणीवर आणून इजिप्तचं एकत्रीकरण करत असे. इजिप्तच्या इतिहासात अश्या “एकत्रीकरणाचा” उल्लेख वारंवार येतो. आणि कित्येक प्राचीन देवळांत अश्या एकत्रीकरणाचं स्मारकही शिलालेख किंवा भित्तिचित्रांच्या स्वरूपात आपल्याला दिसतं. पापिरस हे Lower (म्हणजे उत्तरेचा विभाग) इजिप्तचं प्रतीक होतं. तर कमळ हे Upper (म्हणजे दक्षिणेकडील) इजिप्तचं प्रतिक होतं.


आणि ह्या एकत्रीकरणाच्या स्मारकांत राजा कमळाचं देठ आणि पापिरसचं खोड ह्यांची गाठ मारतो आहे असं दृश्य दाखविलेलं असे (पहा पहिला फोटो - कार्नाक देवालयाच्या भिंतीवरील शिल्पात राजा तिसरा अमेनहोतेप अशी गाठ मारताना). 


पण पापिरसच्या महत्वाचं मुख्य कारण इजिप्तच्या पुराणकथांशी निगडित होतं. इजिप्तशिअन समजुतीनुसार पृथ्वीवरील सर्व जीवनाचा उगम एका प्राचीन दलदलीतून झाला. आणि पापिरसही नाईल नदीच्या मुखाजवळील अश्याच दलदलीच्या क्षेत्रात प्रामुख्याने उगवत असल्याने, पापिरसचं शेत हे जीवनाच्या उगमाचं प्रतीक मानलं गेलं. इजिप्तशिअन पुराणांत देवादिकांच्या आपापसातील चढाओढीच्या (जश्या आपल्या पुराणात राक्षस आणि देवांतील स्पर्धेच्या गोष्टीत आहेत) अनेक कथा आहेत - मुख्यतः सत्याचा विजय आणि दुःप्रवृतींचा विनाश असा बोध देणाऱ्या ह्या कथा आहेत. त्यातील अनेक  प्रसिद्ध कथा सेत (दुष्ट प्रवृतींचं प्रतीक) आणि  ओसिरीस आणि ओसिरीसची बायको आयसिस (सत्प्रवृतींची प्रतीकं) ह्या दैवतांच्यातील युगानुयुगे चाललेल्या युद्धाबद्दल आहेत. त्यातील एका कथेत सेतने ओसिरीसचा वध केल्यावर त्याच्या पासून आपल्या लहानग्या बाळाला - होरसला वाचविण्यासाठी आयसिस पापिरस च्या शेतात लपून बसते असा प्रसंग आहे. अर्थात होरस मोठा होऊन आपल्या बापाचा वधाचा सूड घेतो अशी पुढची कथा आहे. पण प्राचीन इजिप्शिअन समाजाच्या उत्तर काळात होरस हा सर्वात जास्त पुजला जाणारा देव बनला (जसा त्यांच्या पूर्व काळात अमुन हा सर्वात महत्वाचा देव होता) त्यामुळे, ह्या पापिरसला आणि त्याच्या शेताला पवित्रतेचं जे वलय लाभलं त्याच्या खुणा अनेक प्रकारे इजिप्तशिअन देवळांत आज दिसतात. 



उदाहरणार्थ पापिरसच्या देठापासून बनविलेलं “आंख” प्रत्येक देवाच्या हातात तुम्हाला दिसेल (पहा दुसऱ्या फोटोतील ख्रिश्चन क्रॉस सारखं पण गोल डोकं असलेलं चिन्ह, डावीकडून पहिलं). आंख हे सर्व सुख-समृद्धीचं प्रतीक होतं. तसेच बहुतेक देवळातील स्तंभ पापिरसच्या झाडाच्या आकाराचे बनविलेले दिसतील. अनेक देवळांत पापिरसचं शेत दर्शविणारी शिल्पं दिसतील.



ह्याचं सर्वात थक्क करणार उदाहरण आहे कार्नाकच्या देवळातील राजा पहिला सेटी आणि  त्याचा मुलगा दुसरा रामसेस  ह्यांनी उभारलेला मंडप.


सुमारे ५००० चौ. मी. एव्हढ्या जागेत १० ते २१ मी. (म्हणजे ३० ते ७० फूट) उंच आणि ३ मी. (१० फूट) व्यासाचे पापीरसच्या देठाच्या आकाराचे १३४ स्तंभ उभारून दलदलीत उगविणाऱ्या पापिरसच्या शेतातील अंधारं, कुंद वातावरण निर्माण करणारा हा मंडप म्हणजे प्राचीन इजिप्तच्या स्थापत्यकलेचा (कदाचित त्याच्या पिरॅमिड पेक्षाही अधिक) उत्तम नमुना आहे.



प्रत्येक स्तंभ आणि ह्या मंडपाच्या भिंती दोन्ही राजांच्या कारकिर्दीतील यशोगाथा सांगणाऱ्या चित्रांनी भरलेल्या आहेत. मंडपाच्या छतावर (वर उल्लेखलेला दुसरा फोटो ह्या छताच्या शिल्लक राहिलेल्या तुकड्याचा आहे) शुभशकुन दर्शविणारी चित्रे रंगविलेली आहेत. बाकीचे सर्व फोटो ह्या मंडपातील स्तंभ, त्यावरील कलाकुसर आणि भित्तिचित्रांचे आहेत. 






स्त्री स्वातंत्र्याची आद्य उद्गाती?

प्रागैतिहासिक काळापासून आज पर्यंत, जगातील सर्व समाजांत सत्तेची मालकी ही नेहेमीच पुरुषवर्गाच्या हातात राहिली आहे. मग ती राजकीय सत्ता असो, उद्योगधंद्यातील असो किंवा सामाजिक क्षेत्रातील असो. आणि त्याविरुद्ध आवाज उठविणाऱ्या आणि समान हक्कांची मागणी करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला त्याची किंमतही नेहेमीच मोजावी लागली आहे – मग ती स्त्री अगदी हातशेपसुत सारखी इजिप्तची सम्राज्ञी असली तरी सुद्धा.

“हातशेपसुत” हे नाव मी प्रथम ऐकले तेंव्हा मी लक्झर मध्ये नाईल नदीच्या पश्चिमेच्या डोंगराळ भागावर तरंगणाऱ्या बलूनला लटकवलेल्या हौद्यातून खाली दिसणाऱ्या इजिप्तच्या राजे-राण्यांच्या कबरस्थानांचे आणि भग्नावस्थेतील देवळांचे फोटो काढत होतो. पहिल्या फोटोत दिसणाऱ्या ह्या इमारतीकडे बोट दाखवून आमच्या बलूनचा चालक म्हणाला “ते पहा हातशेपसुतचं देऊळ”.


ह्या देवळाची रचनाही तिच्या कारकीर्दीप्रमाणेच बंडखोर आहे -  तत्कालीन रूढ स्थापत्यनियम झुगारून स्वतःचा नवीन पायंडा पाडणारी. बहुतेक सर्व इजिप्शिअन देवळे एकाच साच्यातून काढलेल्या ठराविक घटकांची (दरवाजाच्या दोन्ही बाजूच्या आयताकृती भिंती, आतील विविध आवारे, दगडातून कोरलेले उत्तुंग स्तंभ) ठराविक रचना करून बांधलेली आढळतात. जवळच असलेल्या सम्राट तिसरा रामसेसच्या देवळाची ही परंपरागत रचना (दुसरा फोटो) तुलना म्हणून पाहिली की  हातशेपसुतच्या देवळाचं वेगळेपण ध्यानात येईल. 

केवळ तिचं देऊळच नव्हे तर हातशेपसुतचं संपूर्ण आयुष्यच परंपरागत बंधनांना ठोकरणारं होतं. वंशपरंपरेने  इजिप्तचं सिंहासन बापाकडून त्याच्या पट्टराणीच्या ज्येष्ठ मुलाकडे जाणं अपेक्षित असे. मात्र हे इतक्या सुरळीतपणे क्वचितच घडत असे. कधी तिला मुलगाच नसे, कधी मुलगा अकाली मृत्युमुखी पडे (किंवा मुद्दाम मारला जाई). अश्या प्रसंगी राजवाड्यात अंतर्गत हाणामारी होऊ नये म्हणून बाकीच्या राण्यांपैकी एखादीचा मुलगा भावी सम्राट म्हणून निवडला जात असे. आणि त्याचा राज्यावरचा वांशिक हक्क पक्का करण्यासाठी पट्टराणीच्या ज्येष्ठ मुली बरोबर त्याचं लग्न लावून दिलं जात असे. हातशेपसुतच्या बाबतीतही असंच घडलं. ती तुतमोस १ ह्या सम्राटाच्या पट्टराणीची ज्येष्ठ मुलगी. ती जर मुलगा असती तर वारसाहक्काने तीच सम्राट झाली असती. पण तिच्या बापाच्या मृत्यू नंतर तिचा सावत्र भाऊ तुतमोस २ हा सम्राट झाला. खरं पहाता राज्य चालविण्याची क्षमता आणि कर्तबगारी तुतमोस पेक्षा हातशेपसुतमध्येच अधिक होती. पण तिला त्याची पट्टराणी बनण्यातच समाधान मानावं लागलं.  तुतमोस २ लवकरच वारला आणि पुन्हा एकदा हातशेपसुतवर आपला हक्क गमाविण्याची पाळी आली. कारण तिला फक्त दोन मुलीच होत्या. त्यामुळे एका दुय्यम राणीच्या ६ वर्षाच्या मुलाला तुतमोस ३ नाव देऊन इजिप्तचा सम्राट बनविण्यात आलं. हातशेपसुतसारख्या महत्वाकांक्षी आणि कर्तबगार व्यक्तीला ही दुसऱ्यांदा झालेली आपल्या हक्काची पायमल्ली सहन होणं शक्यच नव्हतं.

परंतु हजारो वर्षांपासून चालत आलेल्या प्रथा सहजा-सहजी मोडणंही सोपं नव्हतं. सुरुवातीला हातशेपसुतने अल्पवयीन तुतमोस ३ च्या नावाने त्याची पालक ह्या नात्याने राज्यकारभार केला. पण धूर्तपणे तिने निष्ठावंत आणि प्रबळ असे सेनेन-मत सारखे मंत्री आणि हापू-सेनेब सारखे धर्मगुरू ह्यांची सक्षम फळी आपल्याभोवती निर्माण केली. हापू-सेनेबच्या मदतीने हातशेपसुत म्हणजे देवाधिदेव अमुनची मुलगी (आणि म्हणून राजसत्तेची खरी हक्कदार) असा प्रचार देशभर केला गेला. सेनेन-मतच्या मदतीने राज्यकारभाराच्या सर्व नाड्या आपल्या हातात घेऊन हातशेपसुतने तुतमोस ३ ला बाजूला सारलं आणि स्वतःलाच इजिप्तचा फॅरो म्हणजे सम्राट (राणी किंवा सम्राज्ञी नव्हे) घोषित केलं. हजारो वर्षांची परंपरा ठोकरून एक स्त्री इजिप्तच्या साम्राज्याची सर्वेसर्वा होणे ही घटना अभूतपूर्वच होती.

हातशेपसुतने २१ वर्ष यशस्वीपणे राज्य केलं. जो कालखंड (१५५० BC ते ११०० BC - १८व्या आणि १९व्या राजघराण्यांचा काळ) इजिप्तच्या सर्वोच्च भरभराटीचे मानला जातो, त्यांची सुरुवातच हातशेपसुतच्या कारकि‍र्दी पासून झाली असं म्हणायला हवं. युद्धांऐवजी व्यापारवृद्धीने इजिप्तचं ऐश्वर्य तिच्या काळात वाढीस लागलं. तिच्या व्यापारी मोहिमांची चित्रे तिच्या देवळाच्या भिंतींवर रेखाटलेली आपल्याला दिसतात (पहा शेजारचा फोटो).




मात्र परंपरेचा पगडा लोकमानसावर एव्हढा जबरदस्त असतो की एक यशस्वी राज्यकर्ती असून सुद्धा तिला आपलं स्त्रीत्व लपवून आपली सार्वजनिक प्रतिमा पुरुषासारखी प्रतीत करावी लागली. अनेक भित्तीचित्रं, पुतळे ह्यात ती पुरुषाच्या रूपात (खोट्या दाढी सकट) आपल्याला दिसेल (चौथा फोटो).



एव्हढंच नव्हे तर तिच्या मृत्यू नंतर जेंव्हा तिचा सावत्र मुलगा तुतमोस ३ सम्राट बनला तेंव्हा त्याने पद्धतशीरपणे तिची स्मृती इतिहासातून पुसून टाकायचा प्रयत्न केला. कर्नाक सारख्या देवळात आजही आपल्याला अनेक ठिकाणी भिंती खोदून पुसून टाकलेल्या तिच्या प्रतिमा दिसतील (पाचवा फोटो).





पण सुदैवाने स्त्री स्वातंत्र्याच्या ह्या आद्य उद्गातीची कथा जिवंतच राहिली.

होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक..

मागच्या अंकात आपण इजिप्त मधल्या एका मनोरंजक पुस्तकाची तोंड-ओळख करून घेतली. इजिप्त सारख्या एखाद्या संस्कृतीची पाळं-मुळं जेंव्हा ५, ७ हजार वर्ष मागे जातात, तेंव्हा त्याच्या सभोवताली अनेक आख्यायिका, दंतकथा, कल्पनाविलास आणि इतिहास ह्यांचं प्रचंड कडबोळं तयार होतं. अर्थात त्या सर्वांचा नुसता दोन ओळीत उल्लेख करायचा झाला तरी “आम्ही पार्लेकरचे” कित्येक अंक खर्ची पडतील. तेंव्हा इजिप्तच्या इतिहासातील दोन विलक्षण व्यक्तींबद्दल – अखेनातेन आणि हातशेपसुत (पुढील अंकात) - थोडंसं बोलून मी हा इजिप्तचा अध्याय सध्या पुरता संपवीन.




सुमारे ३४०० वर्षांपूर्वी अखेनातेन इजिप्तचा सम्राट (Pharaoh) झाला. (पहिला फोटो) एखाद्या सम्राटाचे यशापयश मोजण्याचे सर्वमान्य निकष लावले तर अखेनातेन हा एक अपयशी राजा होता असंच म्हणव लागेल. त्याने कुठलीही युद्धं केली नाहीत, नवीन प्रदेश जिंकून राज्याचा विस्तार केला नाही, शेजारी राज्यांबरोबर नवीन व्यापारी करार केले नाहीत. 


त्यामुळे त्याची प्रमुख राणी नेफरतीती (दुसरा फोटो) तिच्या सौंदर्यामुळे आधुनिक काळापर्यंत लोकांच्या स्मरणात राहिली असली तरी अखेनातेन मात्र पूर्णपणे विसरला गेला.         

साधारण ४००० वर्षांपूर्वी मेनुहोतेप दुसरा ह्याने उत्तर आणि दक्षिण इजिप्तमधील यादवी संपवून एकसंध साम्राज्याची स्थापना केल्यावर, थिबेस (आजचं कार्नाक) हे इजिप्तच्या राजकीय आणि धार्मिक सत्तेचं केंद्रस्थान बनलं. धर्म आणि राजसत्ता एकत्रित असणं सुरुवातीच्या काळात सर्वांच्याच सोयीचं होतं. कारण राजा म्हणजे सूर्यदेवाचा (अमुन-रे चा) पुत्र आणि राजाला विरोध म्हणजे महापाप, अशी समजूत समाजात दृढ करण्यात धर्मसंस्थेची मदत राजाला मिळत होती. आणि त्याबदल्यात धर्मगुरू आपली सत्ता आणि संपत्ती, जनतेची पिळकवणूक करत जोमाने वाढवत होते त्याकडे राजा काणाडोळा करत होता. त्यामुळे अखेनातेन गादीवर आला तेंव्हा, कार्नाकच्या मंदिरातील धर्मगुरूच राज्य चालवीत आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ह्या वातावरणात कार्नाकच्या धर्मगुरूंची राज्यशकटावरील पक्कड आणि सामान्य जनतेची त्यांनी चालवलेली पिळवणूक मोडून काढण्यासाठी अखेनातेनने दोन विवादास्पद निर्णय घेतले.

राजकीय व्यवहारापासून, या डोईजड झालेल्या देवपुजाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी त्याने आपली राजधानी थिबेस/कार्नाक मधून हलवून अमर्ना ह्या नव्याने बांधलेल्या शहरात नेली. आणि इजिप्तचा प्राचीन धर्म मोडीत काढून आतेन ह्या नवनिर्मित देवाच्या नावाने नवीन एकेश्वरवादी सुलभ धर्माची स्थापना केली. पुढील १४ वर्ष त्याने इजिप्तच्या प्राचीन धर्माच्या (आणि परिणामतः धर्मगुरूंच्या सत्तेच्या) नाशाचा प्रयत्न आपल्या एकेश्वरवादी धर्माचा प्रसार करून केला.

इजिप्तच्या पारंपारिक धर्मात नक्की किती देवदेवता होत्या आणि त्यांची आपापसात काय नाती आणि हेवेदावे होते ह्याची गणती कार्नाकच्या सर्वोच्च धर्मगुरुलाही कदाचित करता आली  नसती! आणि धर्माची रचना जेव्हढी गुंतागुंतीची तेवढे त्याच्या अनुयायांकडून खंडणी उकळायचे आणि त्यांना नाडण्याचे मार्ग अधिक, अशी कदाचित अखेनातेनची धारणा एकेश्वरवादाच्या प्रसारामागे असेल. 



पण इतरही अनेक दृष्ट्‍या अखेनातेन काळाच्या फार पुढे होता असं म्हणायला हवं. युद्धांऐवजी त्याने कविता करणं पसंत केलं. परंपरेप्रमाणे त्याने कधीही राजा म्हणजे  देवाचा पुत्र असा पवित्र घेतला नाही. कैरोच्या संग्रहालयातल्या त्याच्या पुतळ्यांमध्ये तो एखाद्या सामान्य माणसारखाच दिसतो. 


त्याच्या चित्रांतही एखाद्या सामान्य माणसाच्या आयुष्यातल्या प्रसंगांसारखे प्रसंग रेखाटलेले दिसतात, बायकोबरोबर गप्पा मारताना, आपल्या लहान मुलीशी खेळताना किंवा घरामध्ये आतेन देवाची पूजा करताना 
(तिसरा आणि चौथा फोटो).


इजिप्तच्या अबू सिम्बेल किंवा कार्नाकच्या देवळातले रामसेस दुसरा किंवा तुतमोसेस तिसरा अश्या प्रसिद्ध फॅरोच्या पुतळ्यांची किंवा भित्तीचित्रांतील त्यांच्या प्रतिमांची अवास्तव आणि कृत्रिम परिपूर्णता पाहिल्यावर तर त्यातील विरोधाभास प्रकर्षाने जाणवतो. (ह्या बाजूच्या फोटोतील रामेसिस २ चा लक्झरच्या देवळातील पुतळा पहा आणि पहिल्या फोटोतील अखेनातेनचं  रूप पहा)

त्याचे प्रागतिक विचार तत्कालीन समाजाला न पटल्यामुळे असेल, किंवा त्याच्या प्रस्थापित धर्माविरुद्ध्च्या बंडाळीमुळे असेल ज्या जनतेला सत्तांध धर्माधिकाऱ्यांपासून वाचविण्यासाठी अखेनातेन झटला, त्यांनीही त्याच्या ह्या नवीन विचारांचा मनापासून स्वीकार केला नाही. त्याच्या मृत्युनंतर त्याचा धर्म विसरला गेला, त्याची राजाधिनी अमर्ना उद्ध्वस्थ करण्यात आली. अखेनातेन नंतर गादीवर आलेल्या तुतनखामून आणि पुढील फॅरोनी त्याचं नाव इतिहासातून पुसून टाकायचा पद्धतशीर प्रयत्न केला.




त्यामुळेच की काय अखेनातेन बद्दल अनेक बिनबुडाच्या आख्यायिका पुढे निर्माण झाल्या. उदाहरणार्थ, अखेनातेन म्हणजेच मोझेस, निदानपक्षी मोझेस अखेनातेनच्या दरबारात होता आणि म्हणून मोझेस पासून निर्माण झालेल्या आजच्या तीन प्रमुख एकेश्वरवादी धर्मांचा (ज्युईश, ख्रिश्चन आणि इस्लाम) मूळ स्रोत अखेनातेन, असा वादग्रस्त पण निराधार सिद्धांत सुद्धा अनेक लोकांनी मांडला (त्यांच्यात सिगमंड फ्रॉइड सारखी प्रसिद्ध व्यक्तीही होती).

ते काही असो, काळाच्या पुढचे विचार करण्याचा “गंभीर गुन्हा” केल्याची शिक्षा म्हणून त्याला विस्मृतीच्या पडद्याआड गाडून टाकलं गेलं, एव्हढं मात्र नक्की.

Tuesday 8 November 2022

स्वर्गारोहणाचे गाईड!

महाभारताच्या महाप्रस्थान पर्वातील पांडवांच्या शेवटच्या प्रवासाची कथा तुम्हाला आठवते का? स्वर्गाच्या दिशेने प्रवास करताना प्रथम द्रौपदी आणि मग एकेक पांडव वाटेत पडतात आणि फक्त युधिष्ठिर आणि त्याचा कुत्रा सर्व संकटांचा सामना करून स्वर्गाच्या दारापर्यंत पोचतात, अशी काहीशी ही गोष्ट फार पूर्वी वाचल्याचं मला आठवतं. त्याची आठवण मला झाली, राजा रामसीस चौथा ह्याच्या थडग्याच्या भिंतींवरील थक्क करणारी चित्रं बघताना  इजिप्त मध्ये.



तीन हजार वर्ष जुनी असून सुद्धा अजूनही जिवंत दिसणारी ही चित्रं म्हणजे एका अतिशय भन्नाट पुस्तकातील निवडक उतारे आहेत. आणि बहुतेक सर्वच इजिप्शियन राजांच्या थडग्यांत भिंतीवर किंवा पापिरस म्हणजे भूर्जपत्रावर ह्याच पुस्तकातील महत्वाचे धडे चित्ररूपाने रेखाटलेले सापडतात.






काय आहे हे पुस्तक? कार्ल लेप्सियस ह्या इजीप्टॉलॉजिस्टने (ज्याने ह्या पुस्तकाचं सर्वात प्रथम इंग्रजी भाषांतर केलं) त्याला नाव दिलं होतं “Book of the Dead”.


पहा पहिला फोटो, ह्या पुस्तकातील काही पाने! – राजा तुतनखामूनच्या थडग्यात मिळालेली. पण खरं तर त्याचं नाव हवं “यशस्वी स्वर्गारोहणासाठी मार्गदर्शक पुस्तिका” किंवा असंच काहीतरी. हे पुस्तक कधी आणि कोणी लिहिलं कोणास ठाऊक. पण इजिप्त मधील पहिल्या साम्राज्याच्या स्थापनेच्या आधीपासून म्हणजे किमान ६ हजार वर्षांपूर्वीपासून ते अस्तिवात असावं.

प्राचीन इजिप्शियन समजुतींप्रमाणे प्रत्येक मृत व्यक्तीचा आत्मा मावळत्या सूर्याबरोबर आपल्या अखेरच्या प्रवासाला निघतो. ह्या प्रवासात येणाऱ्या अडचणींवर जर मात करू शकला तरच तो स्वर्गात पुन्हा एकदा आपला पृथ्वीवरील देह धारण करून सर्व सुखं अनंतकाळ भोगू शकतो.

ह्या अडचणींचा सामना करण्याच्या युक्त्या ह्या पुस्तकात तपशीलवार वर्णिलेल्या आहेत. उदाहरणार्थ मार्गातला पहिला अडथळा आहे अपेप नावाचा सर्पाकृती दैत्य जो ह्या मृतात्म्याला गिळंकृत करायला टपून बसलेला असतो.


त्यासाठी अमुन-रे च्या (म्हणजे सूर्यदेवाच्या) होडीमध्ये आपला शिरकाव कसा करून घ्यायचा आणि अपेपचा परस्पर काटा काढण्यासाठी अमुन-रे ला कसं “पटवायचं” इथूनच त्या पुस्तकाची सुरुवात होते. पहा दुसरा फोटो - आपल्या बोटीत उभा अमुन-रे आणि पंख असलेला सर्पाकृती राक्षस अपेप. 


(पहा  तिसरा फोटो – रामसीस राजा आपल्याल्या होडीत घेण्यासाठी अमुन-रे ची विनवणी करताना. आणि ).


असेच अनेक अडथळे पार केल्यानंतर येणारा एक महत्वाचा टप्पा म्हणजे आत्म्याच्या पाप-पुण्याचा हिशोब. मुख्य न्यायाधीश देव ओसिरीस आणि ४२ इतर देवांच्या न्यायमंडळा समोर मृतात्म्याला आपल्या आयुष्यातील बऱ्यावाईट कृत्यांचा जाब विचारला जातो. देव अनुबिस (कुत्र्याचं डोकं असलेला) आत्म्याने दिलेल्या उत्तरांचा खरेपणा त्या मृत व्यक्तीचं हृदय तराजूच्या एका पारड्यात आणि न्यायदेवता मट्ट दुसऱ्या पारड्यात ठेवून  पडताळून पाहतो. जर उत्तरं चुकीची असतील तर मट्ट आपोआप पिसासारखी हलकी होऊन तिचं पारड वर जातं आणि जवळच टपून बसलेला अमिट नावाचा दैत्य त्या आत्म्याला खाऊन टाकतो (पहा चौथा फोटो – डावीकडे सिंहासनावर बसलेला ओसिरीस
, तराजूपाशी उभा असलेला अनुबिस, हातात लेखणी घेऊन होणारे जाबजबाब लिहून घेण्यास तयार देव थॉथ, आणि त्याच्या डावीकडे खोटं बोलणाऱ्या आत्म्याला खाण्यास सज्ज राक्षस अमिट).

ह्या चौकशीला यशस्वीपणे कसं तोंड द्यायचं, कुठल्या प्रश्नांना काय उत्तरं द्यायची ह्याचं तपशीलवार मार्गदर्शन ह्या पुस्तकात तुम्हाला सापडेल. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्या आत्म्याला स्वर्गात (land of eternal bliss) प्रवेश मिळून त्याचं मृत शरीर पुन्हा एकदा पुनरुज्जीवित होत असे. इजिप्तमध्ये मृत शरीर टिकवून ठेवण्याची (Mummification) प्रथा पडण्याचं हे कारण होतं. 

आणि असं पुनरुज्जीवन झाल्यावर राजाला कसलीही कमतरता पडू नये म्हणूनच मृत राजाच्या शरीराबरोबर त्याचे दागदागिने, भांडीकुंडी, कपडे, खाणं-पिणं, इतकच नव्हे तर त्याच्या नोकर-चाकरांचे आणि सैनिकांचे पुतळे सुद्धा थडग्यात  ठेवले जात. (पहा पाचवा फोटो).

तरी बरं, जिवंत नोकरांना थडग्यात पुरायचा विचार ह्या पुस्तकात कोणी मांडला नाही. 

तर हे सर्व बघताना माझ्या मनात असा विचार आला की “अरेच्या, जर आपल्या देशातही अशी एखादी मार्गदर्शक पुस्तिका लिहिण्याचं कोणाला सुचलं असतं, तर सगळेच पांडव आणि द्रौपदी ती वाचून स्वर्गापर्यंत पोचले असते”!! म्हणून मला रामसेस ४ च्या थडग्यातील ती अप्रतिम चित्रं पाहताना पांडवांच्या महाप्रस्थानाच्या गोष्टीची आठवण झाली.

ॲटलांटीसचा मागोवा

 “मानवाने आपण मिळविलेल्या यशाबद्दल अनाठायी गर्व केला तर नियती त्याला हमखास धडा शिकवते.” अश्या अर्थाच्या कथा जगातल्या सर्वच समाजांच्या नीतिकथांमध्ये आपल्याला आढळून येतील.

प्लेटो ह्या प्राचीन ग्रीक तत्ववेत्त्या पासून ते फ्रान्सिस बेकन आणि थॉमस मूर अशा रेनेसांसकालीन विचारवंतांपर्यंत अनेकांनी, ॲटलांटीस ह्या “पृथ्वीवरील जणू स्वर्गच” अश्या वैभवशाली पण काल्पनिक नगरीच्या सर्वनाशाचं उदाहरण, हाच धडा शिकविण्यासाठी वापरलेलं आपल्याला त्यांच्या लिखाणात दिसेल.

“ॲटलांटीसचे नागरिक आपल्या वैभावामुळे इतके उन्मत्त झाले की ते आपल्या देवांनाच जुमानीनासे झाले. म्हणून झूस ह्या देवांच्या राजाने ॲटलांटीस उध्वस्त करून समुद्रात बुडविले” अशी काहीशी ही कथा प्लेटोच्या टिमेयस आणि क्रायटीयस ह्या ग्रंथामध्ये सापडते.

पण ही काल्पनिक कथा फक्त एक नीतिबोध म्हणून वाचायची आहे ह्याकडे दुर्लक्ष करून १८-१९ व्या शतकात अनेकांनी ॲटलांटीसचा प्रत्यक्ष्यात शोध घेण्यात श्रम आणि वेळ वाया घालवून क्रीट, अझोरेस अशा बेटांपासून दक्षिण अमेरिकेतल्या टिवानाकू पर्यंत अनेक वेगवेगळ्या जागा ॲटलांटीसच कशा आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. जरी ह्या सर्व दाव्यांचा फोलपणा शेवटी लक्ष्यात आला असला तरीही ॲटलांटीसचा शोध मात्र थांबला नाही. जरी ॲटलांटीस पूर्णपणे काल्पनिक असली, तरी ही कल्पना प्लेटोला कुठल्यातरी खऱ्याखुऱ्या प्रागैतिहासिक दुर्घटनेवरून सुचली असणार अश्या विचाराने हा शोध सुरूच राहिला.

सुमारे ४ हजार वर्षांपूर्वी एजियन समुद्रातल्या थेरा बेटावरच्या ज्वालामुखीचा प्रचंड स्फोट झाल्याचा उल्लेख भूमध्य सागराच्या सभोवातली नांदणाऱ्या पुरातन संस्कृतींच्या दस्तावेजात सापडतो.  ह्या स्फोटामुळे निर्माण झालेल्या त्सुनामीने क्रीट बेटावरील मिनोवन साम्राज्य नष्ट केलंच पण त्यासोबत झालेल्या भूकंपाचे धक्के १००० किमी दूर इजिप्तपर्यंत जाणवले होते. ह्या थेराच्या ज्वालामुखीचा उर्वरित अवशेष म्हणजे ग्रीसमधील आजचं सॅन्टोरिनी बेट. 



मी विमानातून काढलेला सॅन्टोरिनीचा हा फोटो पहा (पहिला फोटो). समुद्रात बुडलेल्या ज्वालामुखीच वर्तुळाकार तोंडच केवळ आज पाण्याच्या वर उरलं आहे. थेरा ज्वालामुखीचा हा महाउद्रेकच प्लेटोने वर्णिलेल्या कथेचं स्फूर्तीस्थान असावं असं अनेकांचं म्हणणं होतं.



त्याला पुष्टी देणारे, ब्राँझ युगातील (ख्रिस्तपूर्व सुमारे ५ हजार वर्षांपूर्वीचे) एका प्रगत शहराचे अवशेषही विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सॅन्टोरिनी बेटावरील अक्रोटीरी ह्या खेड्याजवळ सापडले. 
ह्या अवशेषातून प्रतीत होणारं तांत्रिक कौशल्य आणि कलाविष्कार आश्चर्याने थक्क करणारा आहे.



अनेक मजली पक्की बांधलेली घरे, फरसबंदी आखीव रस्ते, मल:निस्सारणाची शहराव्यापी व्यवस्था, उत्कृष्ट दर्जाची आणि कलात्मकतेने सजविलेली भांडीकुंडी, घराघरातील रंगविलेली भित्तीचित्रे ह्या काळाच्या ओघात हरवून गेलेल्या लोकांच्या सामाजिक प्रगतीची साक्ष देतात.

सापडलेल्या पुराव्यानुसार दोन गोष्टी वादातीत आहेत. एक म्हणजे थेरावरील उद्रेकात हे शहर ज्वालामुखीतून फेकल्या गेलेल्या लाव्हा आणि राखेखाली पूर्णपणे गाडलं गेलं. आणि दुसरी – ह्या स्फोटाची पूर्वकल्पना इथल्या रहिवाशांना मिळाली असावी आणि आपलं चम्बुगबाळ आणि गुरंढोरं घेवून ते वेळीच परागंदा झाले असावे. कारण अक्रोटीरीमध्ये सापडलेल्या अवशेषांत सजीव प्राण्यांचे अवशेष जवळजवळ नाहीतच. पण हे लोकं वांशिक दृष्ट्‍या कोण होते, त्यांच्या चालीरीती, धार्मिक विचार, भाषा काय होती आणि थेराच्या स्फोटानंतर त्याचं नक्की काय झालं हे सर्वच प्रश्न आजही अनुत्तरीतच आहेत.

अर्थात जरी प्लेटोच्या कथेचं ते मूळ स्फूर्तीस्थान असलं तरी आजचं सॅन्टोरिनी म्हणजे ताम्रयुगातील थेरा नव्हे किंवा प्लेटोचं ॲटलांटीसही नव्हे. पण प्लेटोने “पृथ्वीवरील स्वर्ग” असं जे ॲटलांटीसच वर्णन केलं आहे ते मात्र आजच्या सॅन्टोरिनीला सुद्धा पूर्णपणे लागू होतं.

हे स्वर्गीय रूप निरखायचा उत्तम मार्ग म्हणजे ज्वालामुखीच्या शिल्लक राहिलेल्या मुखाच्या काठावरील पायवाटेने फीरा ह्या मुख्य गावापासून फिरोस्तेफानी, इमेरोविग्ली अश्या वाटेवरील खेड्यात थांबत थांबत, ईया गावापर्यंत सूर्यास्ताच्या सुमारास पोचावे. डाव्या बाजूला चमकणारा निळाशार समुद्र, उजवीकडे डोळे दिपतील एव्हढी पांढरी शुभ पण समुद्राच्या निळाईचं प्रतिबिंबच अश्या रंगाची छपरं असलेली घरं. 


आणि ईयाला पोचल्यावर आपली निळ्या कायेवर वितळलेल्या सोन्याची शाल पांघरलेला सूर्यास्ताचा समुद्र. 

 









स्वर्ग काही ह्यापेक्ष्या वेगळा असेल असा मला वाटत नाही.


Monday 7 November 2022

बैकल सरोवराकाठचे नंदनवन - बुर्यातिया

तुम्हाला यूल ब्रायनर नावाचा एके काळचा हॉलीवूडचा सुपर-स्टार आठवतो आहे का? तुम्ही जर माझ्या वयाच्या आसपासचे असाल तर Ten Commandments, Magnificent Seven किंवा King and I असे त्याचे गाजलेले सिनेमा तुम्ही नक्कीच बघितले असणार. पण तुम्हाला कदाचित हे माहित नसेल की यूल ब्रायनरचे पूर्वज, बुरयात नावाच्या सायबेरिया मधील एका वैशिष्ठ्यपूर्ण समाजातले होते.

हा बुरयात समाजही मी मागच्या वेळी ज्यांबद्दल लिहिलं त्या तातार लोकांसारखाच चेंगीज खानाच्या मंगोल साम्राज्याचा अवशेष आहे. बुरयात लोकांची मातृभूमी “बुर्यातीया” म्हणजेच  सायबेरियातील अंकारा नदी आणि बैकल सरोवराचा पूर्व किनारा येथील परिसर, हा मंगोल साम्राज्याचाच एक विभाग होता. त्यांची मूळ भाषा मंगोल भाषेचीच बहिण म्हणावी अशी होती, त्यांचा मूळ धर्म सुद्धा मंगोल टोळ्यांच्या पारंपारिक धर्मासारखाच निसर्गपूजे वर आधारित होता. जसजसा मंगोलियात तिबेटी बौद्ध धर्माचा प्रसार वाढत गेला तसा बुरयात लोकांनी सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारला. बुर्यातीया हे आज रशियातील एकमेव बौद्ध राज्य आहे.

१७ व्या शतकात, रशियन फौजांनी भटक्या-विमुक्त बुरयात टोळ्यांचा पराभव करून बुर्यातीयावर आपला कब्जा केला. सांस्कृतिक आणि वांशिक दृष्टीने संपूर्णपणे वेगळ्या अशा रशियन लोकांच्या वर्चस्वाचा स्वीकार मात्र बुर्यातीयामध्ये सहजासहजी झाला नाही. १९३० साली स्टालिनच्या फौजांनी हजारो बुरयात नागरिकांचं शिरकाण करे पर्यंत, जवळ जवळ तीनशे वर्ष बुर्यातीयामध्ये सतत रशियन राज्यकर्त्यांविरुद्ध बंडाळी होत राहिली. स्टालिनच्या राजवटीत जी अनेक  क्रूर हत्याकांडे झाली त्यात बुरयातांच्या ह्या शिरकाणाची गणना फार वरच्या क्रमांकाला होईल. परिणामतः बुरयातांच्या भाषेवर, धार्मिक व्यवहारांवर, पारंपारिक आचारपद्धतींवर बंदी आणून त्यांना मारून मुटकून “रशियन” बनविण्यात आलं. तरीसुद्धा त्यांच्या मूळ सांस्कृतिक संवेदना जीवंत राहिल्या. आज जर तुम्ही बुर्यातीयाला भेट दिलीत तर पाश्चात्य सांस्कृतिक धागे आणि मूळच्या मंगोल/बौद्ध परंपरा ह्याचं एक वेगळचं मिश्रण तुम्हाला पाहायला मिळेल.


बुर्यातीयाची राजधानी उलान-उदे दृष्ट लागेल इतकं सुंदर शहर आहे. १७ व्या शतकात रशियन फौजांनी उदा आणि सेलेंगा नद्यांच्या संगमावर उदिनोस्कोये नावाच एक लष्करी ठाणे उभारलं. आणि जसं जसं रशियन साम्राज्य पूर्व दिशेला पसरू लागलं तसा चीन आणि रशिया/युरोप मधील व्यापाराचा ओघ ह्या भागातून वाहू लागला. येथील एव्हेंक, बुरयात आणि मंगोल रहिवाशांनी ह्या संधीचा पुरेपूर फायदा उठवला. आणि एका दरिद्री खेड्याचं, एका श्रीमंत शहरात रुपांतर झालं. उदिंस्क (मूळ गावाचं नाव) मधील ज्या धाडसी व्यापाऱ्यांमुळे ह्या प्रदेशाची भरभराट झाली, त्यांचं प्रतीकात्मक स्मारक शहराच्या प्रमुख चौकात उभारलं आहे.  

रशियातील कम्युनिस्ट राजवटीत स्टालिनच्या काळात “Social Classisism” ह्या नावाखाली एक वास्तुकला शैली पूर्ण रशियाभर राबविली गेली (कधीकधी जबरदस्तीने सुद्धा). उलान-उदे मधील अर्वाचीन भाग बहुतांशाने ह्या शैलीत बांधलेला दिसेल.



मात्र शहराच्या मूळ मध्यवर्ती विभागात उलान-उदेच्या पारंपारिक सजावटीने नटलेल्या इमारती अजूनही वापरात आहेत (दुसरा आणि तिसरा फोटो).
  

आधुनिक काळात बांधलेल्या बॅले थिएटर मध्ये पारंपारिक संगीत/नृत्याचेही प्रयोग होतात आणि एखाद्या हॉटेल मध्ये पारंपारिक वेशभूषेतील युवती जुन्या प्रथेप्रमाणे भाकरी देऊ करून तुमचं स्वागतही करते (चौथा फोटो). 

      











आणि बुर्यातीयाची भेट, त्याच्या पश्चिम सीमेवरच्या बैकल सरोवरावर एक फेरी मारल्याशिवाय पूर्णच होणार नाही. ट्रेनच्या खिडकीतून बैकलच्या झालेल्या पहिल्या दर्शनापासून आपण वासलेला तोंडाचा आ, गाडी पोर्ट बैकल स्टेशनावर थांबेपर्यंत आपण मिटला नाही आहे, हे सुद्धा माझ्या लक्ष्यात आलं नव्हतं.


बैकल सरोवर हा जगातला सर्वात मोठा पिण्यायोग्य पाण्याचा साठा आहे आणि हे जगातलं सर्वात सखोल सरोवर आहे. पण असं सर्व रुक्ष वर्णन तुम्ही विकीपिडिया वरही वाचू शकाल. आणि बैकल च्या सौन्दर्याचं वर्णन माझ्यापेक्ष्या अधिक सिद्धहस्त लेखकाची लेखणीच करू शकेल. तेंव्हा मी फक्त तुम्हाला एखादा फोटोच दाखवू शकतो (पाचवा आणि सहावा फोटो). 

रशिया आणि सायबेरिया सोडून पुढच्या वेळी आपण थोडं दक्षिणेकडे जाऊ. प्लेटो ह्या सुप्रसिद्ध ग्रीक तत्वज्ञने वर्णन केलेल्या अटलांटीस ह्या काल्पनिक विश्वातल्या नगरीचा थोडासा शोध आपल्या खऱ्या जगात घ्यायचा प्रयत्न करू.

Sunday 6 November 2022

तातारस्तान

 

चार वर्षांपूर्वी मी सायबेरियातील इर्कुतस्क पासून पश्चिमेला सेंट पीटर्सबर्ग पर्यंत रेल्वेने रशिया पालथा घातला. रोज रात्री गाडीत बसायचं आणि सकाळी ज्या गावात गाडी पोचेल तिथे उतरून गाव बघायचं. सर्व रशिया म्हणजे एक एकसंध समाज, एक भाषाएक धर्मएकच संस्कृती – बोल्शोय थिएटरबॅले कंपन्याचेकोवस्कीचं संगीत,दोस्तोयेव्हस्कीच्या कादंबऱ्या अशी काहीशी माझी भाबडी समजूत होती. युरोपात फिरताना बहुतांश देशात असंच एकसंधतेचं चित्र दिसतं. परंतु ह्या सुमारे साडेपाच हजार किमी प्रवासात जागोजाग दिसणारं सांस्कृतिक वैविध्य मात्र मला पूर्ण अनपेक्षित होतं. हा सायबेरिया ते रशिया असा प्रवास करताना जे वेगवेगळे समाज त्यांच्या वैशिष्ठ्यांमुळे लक्षात राहिले त्यांच्या बद्दल थोडंस ह्या आणि ह्यापुढच्या लेखांत.


कझान क्षितिजरेखा - तातारस्तानची राजधानी

“तातार” हा शब्द मी पहील्यांदा वाचला तो पन्नास वर्षांपूर्वी भा.रा.भागवतांच्या “हिम्मतवान जासूद” ह्या पुस्तकात. जुल्स व्हर्नच्या “मायकेल स्ट्रोगॉफ” ह्या कादंबरीचा हा मराठी अनुवाद होता. त्या पुस्तकातील तातार लोकांचं चित्र हे दुष्ट, क्रूर, दरोडेखोर, कारण नसताना निष्पाप लोकांचे हाल हाल करून त्यांचा बळी घेणारे नराधम असं काहीसं रेखाटलेलं होतं. एकूणच मध्ययुगीन युरोपियन लोकांच्या मते सुसंकृतपणाचा मक्ता फक्त त्यांचाच होता आणि जगातील सर्व इतर समाज हे रानटी, हिंसक आणि मागासलेले होते. तातार लोकांची गणतीही ह्या “रानटी” जमातींमध्ये केली जायची. कारण १३ व्या  शतकात मध्यपूर्व आणि मध्य युरोप आपल्या पायदळी तुडवणाऱ्या चेंगीज खानाच्या मंगोल साम्राज्याचे ते पुत्रपौत्र आहेत अशी समजूत होती. ह्या समजुतीत जरी थोडं तथ्य असलं तरी तातार समाजाची मुळे बहुतांशानी युरोपिअनच होती. १० व्या शतकाआधीपासून वोल्गा नदीच्या काठी जिथे आजचं तातारस्तान राज्य आहे त्या भागात बुल्गार टोळ्यांची समृद्ध आणि श्रीमंत, प्रामुख्याने व्यापार करणारी वसाहत होती.

 जुन्या कझान गावाची क्षितिजरेखा

मात्र १३ व्या शतकात चेंगीज खानाचा सेनापती बाटू खान ह्याच्या सैन्याने ती पूर्णपणे उद्ध्वस्त केली. ही मंगोल टोळधाड परतून गेल्यावर मागे राहिलेले मंगोल, त्यांनी केलेल्या संहारातून वाचलेले बुल्गार, तसेच ह्या बुल्गारांच्या जळणाऱ्या चितांवर आपल्याही पोळ्या भाजून घेण्यासाठी उत्तरेकडे आलेल्या तुर्की टोळ्या, ह्यांच्या मिश्रणातून येथील रहिवाश्यांची तातार ही एक नवी ओळख निर्माण झाली. येथील मूळच्या बुल्गार लोकांनी १० व्या शतकातच इस्लामचा स्वीकार केला होता. त्यात तुर्की आणि मंगोल प्रथा मिसळून एक वेगळी स्वतंत्र संस्कृतीच बनली.             

कुल शरीफ मस्जिद

 

                          






चर्च ऑफ अनन्सिशन










तातार समाजाचा ह्यापुढील प्रवासही खडतरच राहिला. १५ व्या शतकात चेंगीज खानाचा नातू तिमुरच्या वंशजांनी पुन्हा एकदा त्याचं शिरकाण केलं आणि कझानच्या खनेतीची सत्ता येथे प्रस्थापित झाली. जेमतेम काही दशकं जनजीवन पुन्हा सुरळीत होण्यात गेली असतील नसतील, तोवर रशियन सम्राट इव्हान (Ivan the Terrible) याने तातारस्तान उद्ध्वस्त केलं.

मंत्रालयाची इमारत


 




चेंगीज खानच्या मंगोल सैन्याला सुद्धा अगदी मवाळ म्हणावं असा हिंसाचार आणि अत्याचार इव्हानच्या युरोपियन फौजांनी येथे केले. अगदी अठराव्या शतकापर्यंत रशियन सत्तेविरुद्ध वारंवार होणारी बंडाळी आणि ती थांबविण्यासाठी होणारी  दडपशाही ह्यामुळे इथलं सामान्य जीवन कायम धकाधकीचच राहिलं. आणि दुष्काळात तेरावा महिना यावा तसं १९१७ साली रशियात झालेल्या राज्यक्रांतीमध्ये तातारस्तान, राजनिष्ठ आणि क्रांतिकारी कम्युनिस्ट ह्या दोन्ही फौजांच्या आपापसात झालेल्या झगड्यात चिरडलं गेलं. कम्युनिस्ट राजवट रशियात असेपर्यंत तातार समाजाची मुस्कटदाबी मागील पानावरून पुढे, अशी चालूच राहिली. त्यांची भाषा, धर्मविधी यावर बंधने घालून त्यांना “रशियन” बनविण्याचा सतत प्रयत्न चालू राहिला.



कझान कम्युनिटी सेंटर (येथे एका वेळी १०० लग्न समारंभ होवू शकतील अशी सोय आहे!!)

 






मात्र स्वतःच्याच राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे तातारस्तान ह्या प्रत्येक संकटातून उठून पुन्हा पुन्हा भरभराटीला येत राहिलं. आज तातारस्तान रशियातील सर्वात समृद्ध, उद्योगप्रधान आणि श्रीमंत राज्य गणलं जातं. त्याची राजधानी कझान ही तर मी पाहिलेल्या जगातील सर्वात सुंदर शहरांमधील एक आहे.

  विसरलेले समाज - २ : टुलोर   चिले देशातील अटाकामा असा प्रदेश आहे जिथे अनेक ठिकाणी गेल्या ५०० वर्षात पाऊसच पडलेला नाही. आणि जेथे पडतो तेथे...