Tuesday 1 November 2022

ईण्डेनचे कळस

 

देशोदेशी ह्या मालिकेतला हा पहिलाच लेख असल्यामुळे थोडीशी प्रस्तावना.

मोहमद असीम नेहाल नावाच्या कवीची एक सुंदर कविता आहे. त्याचं मराठी रूपांतर काहीसं असं आहे.  –

“प्रत्येक भग्न भिंतीचा प्रत्येक दगड म्हणजे त्या भिंतीच्या शांततेमध्ये दडलेली एक कथा आहे, त्यांवरून एक हळूवार हात फिरवा, जिवंत होऊन सांगतील ते तुम्हाला ह्या कथा – प्रेमाच्या, क्रौर्याच्या, मत्सराच्या, औदार्याच्या आणि मृत्युच्याही, पण तुमच्या छातीत एक हृदय पाहिजे ती शांतता ऐकण्यासाठी”.

साधारण तिशीच्या वयात माझ्या पायांना चाकं फुटली आणि त्यानंतर गेली २५-३० वर्षं, अडम तडम् तडतड बाजा म्हणून ज्या दिशेला बोट वळेल, तिकडे भटकलो ते अशा कथा ऐकण्यासाठी. त्यातल्याच काही सांगण्याचा हा एक प्रयत्न!

दक्षिण-पूर्व आशिया - ह्या भागात हजार-दीड हजार वर्षांपूर्वी एक अगदी वेगळ्या प्रकारचं साम्राज्य निर्माण झाल. सर्वसाधारण साम्राज्य तलवारीच्या धारेवर स्थापन होतात, दुर्बलांना आपल्या रथाच्या चाकाखाली चिरडून टिकतात आणि भाल्याच्या फेकीने नष्ट होतात. अशी साम्राज्य ह्या भागात अनेक होऊन गेली – पागान (किंवा बागान), श्रीविजय, मजापहीत, ख्मेर, चंपा इत्यादी.

पण मला अभिप्रेत आहे ते विचारांचं साम्राज्य – आपल्याच पूर्वजांनी स्थापन केलेलं – पण हे “साम्राज्य” पसरलं ते कोणाच्या हुकुमशाही मुळे नाही तर भारतात उगम झालेल्या काही नव्या सांस्कृतिक, धार्मिक आणि कलाविषयक विचारांचा स्थानिक समाजात स्वेच्छेने स्वीकार झाला म्हणून. 

ह्या आपल्या परिचयाच्या विचारांमध्ये स्थानिक संवेदनांची गुंफण होऊन त्यांचा आविष्कार किती विविध प्रकारे होऊ शकतो ह्याची थक्क करणारी उदाहरण आपल्याला व्हिएतनाम, कंबोडिया पासून ब्रह्मदेश, लंकेपर्यंत आज दिसतात.

उदाहरणार्थ – आपण सुरुवात करूया म्यानमार (ब्रह्मदेश) मधल्या इन्ले सरोवराच्या काठावर वसलेल्या इंडेन (Indein) नावाच्या एका छोट्या गावापासून.

गावाबाहेर काही थोड्या एकरांच्या माळरानात, शेकडो बौध्द पागोडा कमी-अधिक पडझडीच्या अवस्थेत इथे पसरलेले दिसतील. त्या मोडक्या भिंती, कोसळलेले कळस, विटांच्या फटीतून उगवलेलं गवत ह्या कडे दुर्लक्ष करून जरा त्यांच्या दरवाजा वरच्या महिरपी निरखून पहा. 

त्यांची रचना, सजावट ह्यातील मूलभूत घटक आपल्या ओळखीचे दिसतील पण त्यांचा वापर अश्या पद्धतीने केला गेला आहे की त्यामध्ये दिसणारी कोणा विसरलेल्या कलाकारांची सर्जनशीलता दृष्टी दिपवणारी आहे.

स्थानिक दंतकथेनुसार हे पागोडा सम्राट अशोकाने बौध्द धर्माचा प्रसार ब्रह्मदेशात करताना बांधविले. आणि नंतर ११व्या शतकात ब्रह्मदेशातल्या पागान साम्राज्याचा संस्थापक सम्राट अनवर्था (अनिरुद्ध) ह्याने त्यांचा जीर्णोद्धार केला. अर्थात उपलब्ध पुरातत्वशास्त्रीय पुराव्यानुसार मात्र हे सर्व पागोडा १२व्या शतकात सम्राट नरपतीसिथु ह्याने बांधले.

सम्राट नरपतीसिथुची कारकीर्द ब्रह्मदेशाच्या इतिहासातला एक महत्वाचा टप्पा आहे. सर्व देशामध्ये एकच लिपी, एकच कायदा, बौध्द धर्माचे एकसूत्रीकरण अशा अनेक घटनांमधून ब्रह्मदेशाची मिळून एक स्वतंत्र ओळख त्यातून निर्माण झाली. पुढे मंगोल सैन्याच्या आक्रमणात पागान साम्राज्य नष्ट झाल्यावर इंडेनच्या शिवारातल्या ह्या वैशिष्ठ्यपूर्ण धर्मस्थळाचा लोकांना विसर पडला. 


आज त्यातील काही भागाचं पुनरूत्थान झालेलं आपल्याला दिसेल.



त्याची एक झलक वरील फोटोमध्ये - पहिले काही फोटो भग्नावस्थेत असूनही थक्क करणाऱ्या कलाकृतींचे, आणि शेवटचे काही, पुन्हा पूर्वीच्या वैभवात झळकणाऱ्या पागोडांचे! 


No comments:

Post a Comment

  विसरलेले समाज - २ : टुलोर   चिले देशातील अटाकामा असा प्रदेश आहे जिथे अनेक ठिकाणी गेल्या ५०० वर्षात पाऊसच पडलेला नाही. आणि जेथे पडतो तेथे...